स्वानुभव

जीवनगंध : पूनम राणे


डिसेंबर महिना सुरू होता. जागोजागी विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू होती. सगळीकडेच मंगलमय वातावरण होते.


विद्यानिकेतन शाळेमध्ये इयत्ता तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खरे म्हणजे या निवासी शिबिरामध्ये एक रात्र विद्यार्थ्यांना शाळेतच थांबायचे होते. वर्गामध्ये तशी सूचना मिळताच मुलांना खूप आनंद झाला; परंतु अथर्व खूपच घाबरलेला दिसत होता. सकपाळ बाई त्याच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या,” अथर्व उदास का दिसतो?” अथर्व म्हणाला,” बाई... बाई... मी माझ्या आई-बाबांना सोडून कुठेही रात्रीचा राहत नाही. त्यामुळे मला खूप भीती वाटते. मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.


सकपाळ बाई म्हणाल्या,” नाही बेटा, आई-वडिलांसोबत राहणं आणि आपल्या समवयस्क मित्रांसोबत राहणं यात खूप फरक असतो, तुला खूप आनंद मिळेल. तुझा वेळ कसा निघून जाईल हे तुला कळणारही नाही आणि हे बघ बेटा “याच करिता आपण हे शिबीर आयोजित केलेले आहे.


शाळा सुटताच अथर्व घरी गेला. आईला सारी हकीगत सांगितली. आई म्हणाली,” हे बघ बेटा, आपल्याच शाळेतील आपल्याच वयाच्या मुलांसोबत राहण्यात खूप आनंद असतो. तो अनुभव घेतल्याशिवाय तुला कसं कळेल त्यामुळे तू मनातील भीती काढून टाक आणि या शिबिराला तू उपस्थित राहावं असं मला वाटतं.”


आई आणि बाईंच्या बोलण्याने अथर्वने शिबिराला जायचे ठरवले. एखादा सण समारंभ असावा अशा पद्धतीने आज शाळा सजवलेली होती. प्रत्येकाला कामाची विभागणी करून देण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम पद्धतीने केले होते. शाळेतील प्रत्येक घटक या उपक्रमात आनंदाने सहभागी झाला होता. रांगोळ्याने पटांगण सजवले होते. विद्युत रोषणाई केली होती. स्टेजच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेवण्यात आले होते.


निवासी शिबिराची वेळ शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी ८वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे कार्यक्रम होत होते. विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना विविध उपक्रम देण्यात आले होते. या निवासी शिबिरामध्ये अभ्यासक्रमासारखं काही घेण्यात आले नव्हते.


विद्यार्थी कौशल्य विकास हे शिबिराचे मुख्य उद्दिष्टे होते. संध्याकाळी ७ वाजता सर्व विद्यार्थ्यांना सभागृहात एकत्र आणून सर्वप्रथम तुळशीवृंदावनाजवळ दिवे लावण्यात आले. सर्वांकडून एक मुखाने शुभंकरोती म्हणून घेण्यात आले. शब्दउच्चार स्पष्ट होण्यासाठी मंत्र, स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, रामरक्षा मारुती स्तोत्र पठण करण्यात आले.


काही विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण वाटत होते. सर्वच विद्यार्थी या निवासी शिबिराचा आनंद घेत होते.रात्री एकत्र जेवण. ऐरवी घरामध्ये हट्टीपणा करणारे विद्यार्थी मुले आज ताटात जे पडेल ते आनंदाने खात होती. एका मोठ्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःचे कपडे स्वतः बदलणे, स्वतःचे अंथरूण स्वतः घालणे. अंथरुणांच्या घड्या घालणे. आपले सामान व्यवस्थित ठेवणे. इत्यादी कामे विद्यार्थी स्वतःहून आनंदाने करत होते. दोन दिवस ते मोबाईलला विसरले होते.


निवासी शिबिराचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात अथर्वनेही आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला,” घरी राहण्यापेक्षा मला इथे कायम राहायला सांगितले तरी ते आवडेल.” इतका आनंद त्याला या शिबिरातून मिळाला होता. केव्हा एकदा आपण घरी जातो आणि या साऱ्या गोष्टी आई-बाबांना सांगतो असे अथर्वला झाले होते. सर्वच पालक आपल्या मुलांची वाट पाहत गेटवर उभे होते. अथर्व धावतच जाऊन आपल्या आईला बिलगला आणि म्हणाला ,”


आई... आई... खूपच मज्जा आली.” आईलाही खूप आनंद झाला. आईने अथर्वला प्रेमाने जवळ घेतले.


तात्पर्य : स्वानुभवातून आणि निरीक्षणातून विद्यार्थी शिकत असतो.

Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी