मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण सुरू आहे. ११५० एकरांवर साधूग्रामसाठी १८०० झाडे तोडण्याच्या योजनेवर तथाकथित पर्यावरणवादी आणि राजकीय नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मात्र धैर्य दाखवून एक खडा आणि तिखट प्रश्न विचारत विरोधकांचा ढोंगीपणा उघड केला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'एक्स' (X) सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करत पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी तोच ज्वलंत प्रश्न उपस्थित केला आहे, जो सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. राणे यांनी म्हटले आहे की, "तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?"
राणे यांच्या या वक्तव्याने स्पष्ट केले आहे की, विरोधकांचा हा विरोध पर्यावरणापेक्षा अधिक राजकीय हेतूने प्रेरित आहे. जेव्हा एखादा धर्म आणि त्याची श्रद्धा येते, तेव्हा गप्प बसणारे हे 'पर्यावरणवादी' हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या आडकाठी आणत आहेत. नितेश राणे यांनी 'सर्व धर्म समभाव'ची व्याख्या केवळ सोयीनुसार वापरणाऱ्यांना आव्हान दिले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असताना, मंत्री नितेश राणे यांच्या या सत्यशोधक वक्तव्यामुळे विरोधकांना आता आपल्या भूमिकेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या प्रश्नावर विरोधकांकडून आता कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.