अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा
अलिबाग : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत रुग्णांना मोबाईलवरून केसपेपर नोंदणीची 'हायटेक' सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असली, तरी हीच ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांना अडचणीची ठरत आहे.
आयुष्मान भारत डिजिटल तंत्रज्ञान, हे एक असे तंत्र आहे, जे नागरिकांना आपले आरोग्य रेकॉर्ड बनवणे, सामायिक करणे आणि डिजिटल व्यवस्थापन करण्याची सुविधा देते. मात्र मोबाईलवर 'आभा' अॅप डाउनलोड करा, मोबाईल नंबरने रजिस्टर करा, क्यूआर कोड स्कॅन करा, टोकन मिळवा आणि नंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन तेच टोकन दाखवून केसपेपर घ्या, एवढी क्लिष्ट प्रक्रिया रुग्णांसाठी 'सुविधा' नसून सरळसरळ त्रासदायक 'यंत्रणा' ठरत आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांचे हाल अधिकच वाढले आहेत. केस पेपर मिळविण्यासाठी आधी ऑनलाईन कसरत करा आणि नंतर पुन्हा रांगेत उभे राहा. डिजिटल सुविधा म्हणून दिलेली ही अडचण आम्हाला नको, असा सर्वसामान्यांचा सूर आहे.
काही रुग्ण ऑनलाईन टोकन मिळविण्यासाठीच रुग्णालयाच्या आवारात तासनतास फिरत राहतात. मोबाईलमध्ये कमी नेटवर्क, अॅपचा उशीर, स्कॅनिंगमध्ये अडचणी यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ऑनलाईन सुविध आणण्यामागील उद्देश रुग्णांना रांगेपासून मुक्त करणे हा होता; परंतु प्रत्यक्षात टोकन, स्कॅन, रजिस्ट्रेशन आणि पुन्हा रांग अशी 'दुहेरी' कसरत रुग्णांकडून करवून घेतली जात आहे. डिजीटल वळणाचे स्वागत असूनही ही प्रक्रिया तत्काळ सुलभ न केल्यास रुग्णांसाठी सुरू असलेली ही रोजची धावपळ आरोग्य व्यवस्थेवरील नाराजी अधिक वाढविण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या खिडक्यांची व्यवस्था असूनही नागरिकांना तासंत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. डिजिटल प्रक्रियेने ही रांग कमी होईल अशी अपेक्षा होती, पण टोकन मिळविण्यासाठीच आता नवीन रांग तयार झाली आहे. रुग्णालयातील आभा कक्षात क्यूआर स्कॅन करण्यासाठी उसळणारी गर्दी पाहून अनेकजण संतापून म्हणत आहेत, आधीची पद्धत बरी होती.