सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असून अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
अनुयायांसाठी जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा व आरोग्यविषयक सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी ८ हजारांहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी कर्तव्यतत्पर असणार आहेत. चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर व महानगरपालिकेच्या विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान व अन्य ठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले असून या अानुषंगाने, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्या नेतृत्वात विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. डॉ. अश्विनी जोशी यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे प्रत्यक्ष भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे १ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) निवासी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी मंडपांत १० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन केले आहे. तर, मैदानाभोवती १ हजार मीटर लांबीचे तात्पुरते कुंपण उभारले आहे. परिसरात स्वच्छतेसाठी ५२७ कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात कार्यरत असतील. दर्शन रांग व मुख्य मार्गांवर एकूण १५० फिरती शौचालये, अभिवादन रांगेत १०, मैदान परिसरात २५४ शौचालये, महिलांसाठी पिंक टॉयलेट्सची, तसेच नळ व शॉवर सुविधेसह २८४ तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. २० रुग्णवाहिका, डेंगी व हिवताप (मलेरिया) बाबत जनजागृतीसाठी कक्ष, आरोग्य तपासणी व औषधोपचार आदी वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ५८५ एवढ्या संख्येने तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत असेल. गतवर्षी १३ हजार २८२ अनुयायांनी आरोग्य तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला होता. कीटकनाशक व मक्षिका नियंत्रण फवारणीसाठी मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.