ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने काल (३० नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेनुसार २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूका पार पडणार होत्या. मात्र राज्यातील काही ठिकाणी २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणूका आता २० डिसेंबरला पार पडणार आहेत. यामध्ये अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे.
यानिर्णयाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबरला होणार की २० डिसेंबरला याबाबत अंबरनाथ निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडेही स्पष्ट उत्तर नसल्याने अंबरनाथचे मतदार आणि निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. कारण अंबरनाथ नगरपरिषदेकरता होणारे मतदान नेमकं कधी आहे? यावर अधिकृत उत्तर नसल्याचे निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि अमित पुरी यांनी पत्रकार परीषद घेत सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही दिवशी होणार असून ज्या ११ वॉर्डातील उमेदवारांनी अपील केले होते, फक्त त्याच ११ वॉर्डातील निवडणुकांकरिता २० डिसेंबरला मतदान होईल. अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या काही प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकण्यात आली आहे.






