अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक विजय
मुंबई : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो, श्रीलंका येथे आयोजित पहिल्या विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचत अजिंक्यपद पटकावले आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या सहा देशांच्या स्पर्धेत भारताने सर्व प्रतिस्पर्ध्यांचा दणदणीत पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
या सुवर्णयशात महाराष्ट्राच्या गंगा कदम हिच्या नेतृत्वगुणांचा आणि खेळातील सातत्यपूर्ण योगदानाचा मोठा वाटा आहे. मराठवाड्यातील मर्यादित आर्थिक परिस्थितीतून आलेल्या गंगा ही सात बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार सांभाळत आपल्या मेहनतीने राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकली आहे. भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून तिने आपल्या संघाला उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित केले. महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणूनही तिने यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
गंगा कदमसह संपूर्ण संघाला शासनाकडून यथोचित सन्मान, प्रोत्साहन आणि खेळाडू म्हणून अधिकृत मान्यता मिळावी, अशी क्रीडा क्षेत्राकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक योजना आखल्या असल्या, तरी गंगा कदमच्या प्रकरणी तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जात असताना, अंध क्रिकेट क्षेत्रात मिळालेले हे जागतिक यश स्थानिक क्रीडा संघटनांनी आणि क्रिकेट विश्वाने अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे अंध खेळाडू अधिक जोमाने पुढे यावेत यासाठी योग्य प्रोत्साहन, मान्यता आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध झाल्यास अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळेल.
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील पंधरा वर्षांपासून अंध खेळाडूंसाठी प्रशिक्षण, निवड शिबिरे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करत सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या सहकार्याची साथ लाभल्यास या खेळाडूंना अधिक व्यापक व्यासपीठ मिळून राज्याचा क्रीडा वारसा अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.