मावळ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याच वेळी नगरपरिषद कार्यालयात अनपेक्षितरित्या तणाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण दिसून आले.
तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात असली तरी भाजप–राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. नेतृत्वपातळीवर दोन्ही पक्षांनी युती कायम ठेवली असली तरी स्थानिक पातळीवर उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे नाराजीत भर पडली आहे.
तळेगावमध्ये तब्बल १९ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यात राष्ट्रवादीचे १० आणि भाजपचे ९ उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडणुकीनंतरही उर्वरित जागांवर तणाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेली धक्काबुक्की ही किरकोळ चकमक नसून युतीतील विसंवाद आणखी वाढत असल्याचा इशारा असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचेही समजते. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने परिस्थिती बिघडली नाही, परंतु पुढील टप्प्यांत हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो का, की समन्वय साधून महायुती निवडणुकीत एकत्रितपणे लढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.