Monday, November 17, 2025

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई

मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका मुंबईकरांना बसला आहे. रविवारी दुपारपासून सीएनजीचा (CNG Gas) पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे शहरातील अनेक सीएनजी पेट्रोल पंपांवर गॅस उपलब्धच झाला नाही. परिणामी मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील (Navi Mumbai) बहुतांश पंपांवर सीएनजी पूर्णपणे संपली असून वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. रविवार पुरता मर्यादित असलेला हा तुटवडा सोमवारी सकाळी आणखी तीव्र झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या नागरिकांना रिक्षा आणि टॅक्सींची मोठी कमतरता जाणवू लागली. सीएनजी उपलब्ध नसल्याने अनेक वाहनचालकांनी सकाळपासून गाड्या रस्त्यावर आणण्यास टाळाटाळ केल्याने सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कार्यालयीन प्रवाशांना रस्त्यावरच दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. काही पंपांवर गॅस येण्याच्या शक्यतेने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्या तरी तुटवडा कायमच राहिल्याने लोकांची चिंता वाढली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून पुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुरुस्तीला विलंब, मुंबईत सीएनजी वाहतूक ठप्प होण्याची भीती

वडाळा येथील आरसीएफ परिसरातील मुख्य पाईपलाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला येणारा सीएनजी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या बिघाडाची दुरुस्ती नेमक्या किती वेळात पूर्ण होईल, याबाबत गेल कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी या दोघांच्याही चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबच्या टाक्यांमधील सीएनजीही आता संपत चालली आहे. पुरवठा बंद असल्याने नवे रिफिल मिळत नाही आणि मोजक्या गाड्या उरलेल्या गॅसवर कसाबसा प्रवास करत आहेत. सकाळीच परिस्थिती गंभीर असताना, दुपारपर्यंत पुरवठा सुरळीत न झाल्यास मुंबईतील सीएनजीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिक्षा-टॅक्सींसह खासगी सीएनजी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढू शकतात.

आरसीएफमधील मोठ्या पाईपलाईन बिघाडामुळे मुंबई महानगरात सीएनजी संकट तीव्र; १३३ पंपांवर परिणाम

नेमकं घडलं काय?

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये सीएनजीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. वडाळा येथील आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य सीएनजी पाईपलाईनमध्ये गंभीर बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या पाईपलाईनद्वारे एमजीएलच्या वडाळा सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा अचानक कमी झाल्याने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला. महानगर गॅस लिमिटेडने घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले असले तरी, सीएनजीवर चालणारी सार्वजनिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांवरील परिणाम गंभीर असून पुरवठा कमी झाल्याचा सर्वाधिक फटका या वाहनचालकांना बसत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण १३३ सीएनजी पंपांवर या बिघाडाचा थेट परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील मोठा वाहनताफा विशेषत रिक्षा, टॅक्सी आणि BESTच्या काही बसेस सीएनजीवर चालत असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठी विस्कळीतता निर्माण झाली आहे. या अनपेक्षित बिघाडामुळे नागरिकांचे दैनंदिन प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून स्थिती पुन्हा सुरळीत होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

Comments
Add Comment