Mangesh Desai : आता 'धर्मवीर ३' नाही, तर 'गुवाहाटी फाइल्स'? निर्माते मंगेश देसाईंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; म्हणाले...

मुंबई : दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला गेलेला मंगेश देसाई (Mangesh Desai) निर्मित 'धर्मवीर' हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला, त्यानंतर काही महिन्यांतच महाराष्ट्राच्या राजकारणाने मोठे वळण घेतले. 'धर्मवीर' (२०२२) प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच महाराष्ट्रात मोठे राजकीय सत्तांतर झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदार आणि खासदारांसह भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर 'धर्मवीर २' (Dharmveeer 2) हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला. अशातच, आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सिनेवर्तुळात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ राजकीय पटलावर काय लावला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



ठाण्यात शिवसेनेचे नेतृत्व कसे बदलले? निर्माते मंगेश देसाईंच्या विधानाने चर्चा


निर्माते मंगेश देसाई सध्या त्यांच्या आगामी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेले एक विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. हे विधान त्यांनी शिवसेना आणि ठाण्याचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कार्यावर केले आहे. आनंद दिघे यांनी त्यांच्या काळात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मजबूत ठेवण्याचे मोठे काम केले होते. ठाण्यातील टेंभीनाका येथे दिघे यांच्या मठात जनतेचा दरबार भरायचा. या दरबारात सामान्य जनता त्यांच्या अडचणी आणि समस्या थेट दिघे यांच्यासमोर मांडायची. दिघे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर असायचे. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे गेली, यावरही देसाईंनी भाष्य केले. आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रघुनाथ मोरे यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर, ही महत्त्वाची जबाबदारी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. मंगेश देसाईंच्या या विधानामुळे, ठाण्यातील शिवसेनेचा राजकीय प्रवास आणि आनंद दिघे यांच्या वारशाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



'धर्मवीर' चित्रपट मालिकेचा राजकीय योगायोग


'धर्मवीर' या पहिल्या भागात आनंद दिघे यांच्या कार्यासोबतच, त्यांचे निष्ठावान सहकारी आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील प्रभावीपणे दाखवण्यात आली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काहीच महिन्यांमध्ये, एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत, काही आमदार आणि खासदारांसह भाजपसोबत युती केली. या राजकीय बंडानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०२४ मध्ये या चित्रपट मालिकेचा दुसरा भाग 'धर्मवीर २' देखील प्रदर्शित झाला. या चित्रपट मालिकेचा राजकीय घडामोडींशी आलेला हा योगायोग आजही सिनेवर्तुळात आणि राजकीय वर्तुळात चर्चा, विश्लेषण आणि वाद-विवादाचा विषय ठरत आहे.



'धर्मवीर ३' ऐवजी 'गुवाहाटी फाइल्स' येणार?


'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २' या चित्रपट मालिकेनंतर आता 'धर्मवीर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात होता. मात्र, सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यावर मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. दिलेल्या मुलाखतीमध्ये मंगेश देसाई यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टबद्दल बोलताना एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे, "आता धर्मवीर ३ नाही, जर मी चित्रपट केला तर तो 'गुवाहाटी फाईल्स' (Guwahati Files) करेन आणि तोसुद्धा २०२७-२८ ला करेन. त्याचं अजून नक्की काहीच नाही." मंगेश देसाई यांनी 'गुवाहाटी फाइल्स'चा उल्लेख केल्यामुळे, हा चित्रपट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या राजकीय बंडावर आधारित असेल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आनंद दिघे यांच्या कार्यापासून थेट राज्याच्या सत्तांतराचा थरार पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. देसाईंनी अद्याप याबद्दल कोणतीही निश्चिती दिली नसली, तरी त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या पुढील सिनेमाच्या विषयाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली