Sunday, November 9, 2025

राज्यात गारठा वाढला !

राज्यात गारठा वाढला !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवर

मुंबई  : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही देखील विशेषकरून उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पारा केवळ १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला. नाशिकमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकणात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज तसेच राज्यातील इतर भागांपेक्षा थंडी कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरात किमान तापमान १६ अंश सेल्सियस पेक्षा कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर कोल्हापूरमध्ये १९ अंश सेल्सियस इतके नोंदविले. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी वाढली आहे, तर विदर्भातील अमरावतीत पारा चांगलाच घसरला असून तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. कोकणपट्ट्यात हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र १४ नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही.

Comments
Add Comment