मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला.
दरम्यान हाँगकाँग सिक्सेज क्रिकेट स्पर्धेत 'क' गटातील एका महत्त्वपूर्ण भारत सुपर सिक्सेस लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. आशिया चषक २०२५ मधील वर्चस्वानंतर, या स्पर्धेतही भारतीय संघाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईसने नियमानुसार २ धावांनी धुव्वा उडवत आपला दबदबा कायम ठेवला.भारतीय संघ यंदा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळला असून पाकिस्तान संघाची धुरा यंदा कर्णधार अब्बास अफरीदीच्या खांद्यावर होती. तसेच हा सामना पूर्ण षटकांचा खेळला जाऊ शकला नाही आणि अखेरीस डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर भारताला विजयी घोषित करण्यात आले. या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला २ धावांनी पराभूत केले. भारताचा सलामीचा फलंदाज रॉबिन उथप्पा याला त्याच्या आक्रमक खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांमध्ये ४ गडी गमावून ८६ धावा फटकावल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ८७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या डावात ३ षटकांमध्ये १ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या, पण त्याच वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेरीस, डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले.
पाकिस्तानविरुद्धच्या या डावाची सुरुवात करण्यासाठी रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली मैदानात उतरले. या दोन्ही सलामीच्या फलंदाजांमध्ये पहिल्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी झाली आणि त्यानंतर उथप्पा बाद झाला. उथप्पाने अवघ्या ११ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ धावांची जलद खेळी साकारली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २५४.५५ होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला स्टुअर्ट बिन्नी फारशी चमक दाखवू शकला नाही आणि तो २ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या सहाय्याने ४ धावा करून तंबूत परतला.
चौथ्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक स्वतः फलंदाजीसाठी उतरला. त्याने ६ चेंडूंमध्ये एक षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २८३.३३ होता. भारतासाठी भरत चिपलीने १३ चेंडूंमध्ये २ षटकार आणि २ चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले, तर अभिमन्यू मिथुनने ५ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या आणि तो धावबाद झाला. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शहजादने सर्वाधिक २ बळी घेतले, तर अब्दुल समदला एक यश मिळाले.
पावसामुळे थांबलेल्या दुसऱ्या डावात पाकिस्तानने ३ षटकांमध्ये १ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानसाठी ख्वाजा नफे आणि माज सदाकत यांनी डावाची सुरुवात केली होती. माजने ३ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या आणि तो स्टुअर्ट बिन्नीचा बळी ठरला, तर ख्वाजा नफे ९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि एका चौकारासह १८ धावा काढून नाबाद राहिला. अब्दुल समदने ६ चेंडूंमध्ये एक षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने १६ धावा काढल्या आणि तो देखील नाबाद राहिला.






