मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल मैदानावर रंगणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे हा सामना मालिकेचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.
तिसऱ्या सामन्यात काही बदल करून टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं. आता चर्चेचा विषय आहे तो चौथ्या सामन्याचा संघ. या सामन्यासाठी वन डे टीमचा कॅप्टन आणि टी २० टीमचा व्हाईस कॅप्टन अर्थात उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळणार की संघात ठेवणार या प्रश्नाचे उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.
शुभमनला मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने आतापर्यंत एकूण ५७ धावा केल्या आहेत आणि सलग दहा टी २० सामन्यांत एकदाही अर्धशतक झळकावलेलं नाही. ही कामगिरी ना संघासाठी उपयोगाची ठरत आहे, ना त्याच्या लौकिकाला साजेशी आहे.
अभिषेक शर्मा सतत चांगली कामगिरी करत असताना गिल मात्र संघर्ष करताना दिसतो आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आता गिलऐवजी संजू सॅमसनला पुन्हा संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गौतम गंभीर यांच्या कोचिंगखाली शुभमनला संघात स्थान मिळावे म्हणून संजूच्या ओपनिंग पोजिशनमध्ये बदल करण्यात आला होता. संजू पूर्वी सलामीला खेळत होता, पण गिलच्या पुनरागमनानंतर त्याला मिडल ऑर्डरमध्ये हलवण्यात आलं. मात्र या बदलाचा काही विशेष परिणाम दिसला नाही, उलट तिसऱ्या सामन्यात संजूला संघातून बाहेर बसावं लागलं.
आता चौथ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गंभीर पुन्हा संघरचनेत बदल करतील का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
संभाव्य भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल / संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.