तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मने जिंकली. मात्र आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत ते खेळण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय (व्हाईट बॉल) मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील ही तीन लिस्ट ‘अ’ सामन्यांची मालिका १३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दुसरा सामना १६ नोव्हेंबरला, तर तिसरा आणि शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. ही तिन्ही सामने राजकोटमध्ये डे-नाईट स्वरूपात पार पडतील. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल.
रोहित आणि विराट सध्या फक्त ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये (वन-डे) खेळत आहेत, त्यामुळे त्यांना या मालिकेच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयकडून भारत ‘अ’ संघाची घोषणा एक-दोन दिवसांत होऊ शकते. परंतु, निवडकर्त्यांनी या तीन सामन्यांसाठी काही वेगळ्या योजना आखल्या असून, या मालिकेसाठी दोन्ही दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्याची शक्यता नाही.
सध्या भारत ‘अ’ संघ बंगळूरुमधील सीओई मैदानावर दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दोन सामन्यांच्या रेड बॉल मालिकेत खेळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने २ नोव्हेंबरला संपलेला पहिला ४ दिवसांचा सामना जिंकला आहे, तर दुसरा सामना ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
रिपोर्टनुसार, भारतीय निवड समिती लवकरच बैठक घेऊन टेंबा बावुमाच्या संघाविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्याच बैठकीत भारत ‘अ’ संघाची निवड होण्याचीही शक्यता आहे.
कसोटी संघाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या संघात फारसे बदल अपेक्षित नाहीत, फक्त एन. जगदीसनच्या जागी ऋषभ पंतचा समावेश होऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका अनुक्रमे १४ ते १८ नोव्हेंबर (कोलकाता) आणि २२ ते २६ नोव्हेंबर (गुवाहाटी) दरम्यान होईल.कसोटीनंतर ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल, ज्यासाठी रोहित आणि विराट यांची निवड जवळपास निश्चित आहे.
विक्रमी भागीदारीतून भारताला विजय
रोहित आणि विराट, ज्यांनी भारताचं नेतृत्व सर्व फॉरमॅटमध्ये केलं आहे, हे नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळले होते. त्या मालिकेत रोहित पहिल्या सामन्यात अपयशी ठरला, तर कोहली पहिल्या दोन सामन्यांत फारसा चमकला नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात दोघांनी शानदार खेळी करत विक्रमी भागीदारीतून भारताला विजय मिळवून दिला.