मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकावर काळ धक्कादायक घटना घडली. स्टेशनवर झोपले असताना एका दाम्पत्याच्या ८ महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं. दांपत्य गाढ झोपेत असताना त्यांच्या कुशीतून या बाळाचे अपहरण करण्यात आले. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आपले बाळ गायब झाल्याचे कळताच दाम्पत्याने लगेचच पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या सहा तासांच्या आत चोरीला गेले बाळ दाम्पत्याला परत मिळवून दिले. पोलीस हवालदार सतीश सोनावणे यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा योग्य ठावठिकाणा लागला. या प्रकरणी अक्षय खरे आणि आत्या सविता खरे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गाढ झोपेत असताना बाळ चोरले
पुणे येथे हे दाम्पत्य राहत होते. मोलमजुरीच्या निमित्ताने ते कल्याण शहरात आले होते. कल्याणमध्ये दिवसभर मजुरी करून हे दाम्पत्य त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे राहण्यास घर नव्हते. त्यात पाऊस सुरु असल्याने हे दाम्पत्य आपल्या आठ महिन्याच्या बाळासह रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना या दाम्पत्याचे ८ महिन्याचे बाळ एका तरुणाने उचलून नेले. सकाळी जाग येताच बाळ गायब झाल्याचे कळताच आईने हंबरडा फोडला. या आईचा हंबरडा पाहून स्थानकावरील महिला प्रवाश्याना गहिवरून आले. या प्रवाश्यांची दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सहकार्य केले.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सर्वप्रथम ज्या ठिकाणाहून बाळ चोरीला गेले तिथले सीसीटीव्ही फुटेज चित्रण तपासले. मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण चोरपावलांनी आला आणि त्याने दाम्पत्य झोपलेल्या फलाटावरील ठिकाणी येऊन बाळाला चोरून नेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी हा व्हिडीओ समाज माध्यमांसह पोलिसांच्या व्हाट्स अप ग्रुपवर प्रसारित केला.
हा व्हिडीओ जेव्हा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश सोनावणे यांच्या निदर्शनास आल्यांनतर त्यांनी बाळाला अपहरण करून नेणारा असं परिचित असल्याचे तसेच त्याचा एक भांडण प्रकरणाशी संबंधाने रात्री महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आला असल्याचे आढळले. हवालदार सतीश सोनावणे यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी सांगितली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क करत २ तपास पथके आरोपीचा शुद्ध घेण्यासाठी निघाली.
असा लागला शोध
पोलीस ठाण्यात रात्री दाखल झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यातील पत्यावर पथक गेले, दुसरे पथक अन्य भागात बाळाचा हंसिद्ध घेत होते. नोंदवलेल्या पत्त्यावर पोलीस गेले असता. अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे यांच्या ताब्यातून कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण केलेलं बाळ आढळले. महात्मा फुले पोलिसांनी हे बाळ लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुखरूपपणे बाळाच्या आईच्या ताब्यात दिल्याचे सहाय्यक आयुक्त घेटे यांनी सांगितले. अक्षय आणि त्याची आत्या सविताने या बाळाचे अपहरण कश्यासाठी केले या दिशेने पोलिसांची चौकशी सुरु आहे.