निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत अपमान!'


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, राज ठाकरे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी आयोगाला थेट 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं' असं संबोधून लोकशाहीच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.


राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, "आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप कोणीतरी मला पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. प्रत्यक्षात हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण 'दुबार मतदार नोंदणी'च्या मुद्द्यावरून तापले आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी या गंभीर अनियमिततेविरोधात आवाज उठवला असून, मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढून मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका न घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने विरोधकांच्या या मागणीला जुमानले नाही आणि आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.


राज ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरताना विचारले की, "दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय?" पुढे त्यांनी थेट विचारणा केली, "जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय?"


राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की, "महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल." तसेच, त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची कोंडी करणाऱ्या पत्रकारांचेही मनापासून अभिनंदन केले आहे.


राज्यात दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा हिंदू-मुस्लिम नावांचा संदर्भ देत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठे राजकीय युद्ध पेटवत आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला आता राज ठाकरे यांच्या मनसेचाही पूर्ण पाठिंबा मिळाला असून, त्यांनी 'मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा', असा थेट इशाराही दिला आहे. यापूर्वी त्यांनी 'दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फोडून काढा', असेही आक्रमक आवाहन केले होते. विरोधकांचा हा तीव्र विरोध असतानाही आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने राजकीय संघर्ष आता आणखी वाढणार का, हे पहावे लागेल.


Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी