मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ बदलण्यासाठी रस्ते तथा पदपथ खोदकाम करण्यात येते. मात्र, खोदकाम केलेले पदपथ तसेच रस्ते पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या कंत्राटदारांची खोदलेले चर योग्यप्रकारे बुजवले जात आहे. काही थातुरमाथुर काम करत खोदलेले चर बुजवण्याचा प्रयत्न होत असला तरी ही अर्थवटच केली जातात, परिणामी नागरिकांना सुविधेऐवजी गैरसोयीचाच सामना करावा लागतो.
मुंबईतील सेवा सुविधा अर्थात युटीलिटीजच जसे की विद्युत तसेच इंटरनेट केबल्स, पाईपलाईन्स आदी प्रकारच्या विविध प्रकारच्या सेवा सुविधांचे जाळ पसरले आहे. त्यामुळे त्यात बिघाड झाल्यास अथवा नव्याने वाहिन्या टाकताना खोदलेले चर महापालिकेने नेमलेल्या संबंधित कंत्राटदाराकडून जसे होते त्याच स्थितीत बुजवून देणे बंधनकारक आहे. परंतु कंत्राटदारांकडून सध्या अशाप्रकारची काळजी घेतली जात नाही. नियमानुसार रस्ता अथवा पदपथ पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट किंवा डांबराचे असल्यास तसेच सुस्थितीत आणणे आवश्यक असतानाही महापालिकेच्या ए विभागातील हिमालय पुल शेजारील महात्मा ज्योतिबा फुले मंडईकडे जाणाऱ्या पदपथावर खोदकाम केल्यानंतर येथील पेव्हर ब्लॉक काढून ठेवले आहे.

याठिकाणचे पेव्हरब्लॉक बसवणे शक्य नसल्याने त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटद्वारे हे चर बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे चर पूर्णपणे न बुजवता काही भागांतच सिमेंट काँक्रिटचे मिक्स टाकून उर्वरीत भाग तसाच सोडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिवसाला हे सिमेंट काँक्रिटचे मिश्रण टाकल्यानंतर त्याठिकाणी कुणाचा वावर नसावा किंवा त्यावरुन कुणी चालून जावू नये यासाठी बांबू किंवा अन्य साहित्य तिथे ठेवणे आवश्यक असते. परंतु याचीही काळजी न घेतल्याने केवळ काही भागांतच सिमेंट काँक्रिटचे मिश्रण टाकून ही मंडळी निघून गेली आणि त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना न केल्यामुळे त्यावरून अनेक जण चालून गेले आणि त्यामध्ये पावलांचे ठसे उमटले. आधीच या कंपनीची माणसे अर्धवट कामे करत असतात आणि त्यातच ते कोणतीही काळजी घेत नसल्याने पुढे अशाप्रकारे लोकांकडून चालल्याने ती कामे खराब झाली अशी कारणे देवून ते मोकळे होतात. त्यामुळे चर बुजवण्याच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून कोणतीही काळजी तसेच नियमांनुसार काम केले जात नसल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे आधीच खोदलेल्या चरांमुळे नागरिकांना त्रास होतो आणि आता त्याची वेळेवर दुरुस्ती जात नसल्याने तसेच अर्धवट कामे केली जात नसल्याने नागरिकांना सुविधा ऐवजी गैरसोयीलाच अधिक सामोरे जाण्याची वेळ येत आहे. एका बाजुला कंत्राटदार चुर बुजवण्याच्या नावाखाली कोटयवधी रुपये खर्च केले जात आहेत.