Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे आणि आरोपींनी ही हत्या कोणत्या उद्देशाने केली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



३० सेकंदांत हल्लेखोरांनी गळा चिरला


शहाबाजार परिसरात निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव (Sameer Khan Inayat Khan alias Malegaon) असून त्याचे वय ३० वर्षे होते आणि तो चेलीपुरा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदांत हा प्राणघातक हल्ला केला आणि धारदार शस्त्राने समीर खान यांचा गळा चिरला. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून आणि सूडबुद्धीने झाल्याचा संशय आहे. या संशयाला बळकटी देणारे कारण म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच समीर खान यांच्यावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस आता या हत्येचा आणि मागील गुन्ह्याचा संबंध तपासत आहेत.




'निशान दर्गा' परिसरात दिवसाढवळ्या थरार


शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कबड्डीपटू समीर खान यांची हत्या नेमकी कशी झाली, याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे. समीर खान निशान दर्गा परिसरात उभा असताना, चार आरोपी तेथे आले. यापैकी तिघांनी तोंडाला रुमाल, उपरणे किंवा शाल बांधलेली होती, तर त्यांचा चौथा साथीदार टेहळणी करत होता. तोंड झाकलेल्या या तिघांनी अचानक तलवारीसारख्या धारदार हत्याराने समीरवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीने समीरचा गळा चिरला, तर दुसऱ्याने त्याला चाकूने भोसकले. अवघ्या ३० सेकंदांत हा जीवघेणा हल्ला करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.



मित्राच्या फोननंतर समीर खानची हत्या


समीर खान यांना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मित्र शारेक बाली याचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी समीर खान घरातून आपल्या दुचाकीवरून (MH-20-GD-4058) निघाले होते. घटनेनंतर शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला, सना यांना फोन केला आणि सांगितले की, "भाभी, समीरला तीन-चार जणांनी हत्याराने मारले." माहिती मिळताच समीर यांची पत्नी सना यांनी शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत धाव घेतली, तेव्हा त्यांना त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला सांगितले की, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या चार जणांनी तलवारीने हल्ला केला. या माहितीमुळे पोलिसांनी आरोपींच्या शोधाची आणि पुढील तपासाची दिशा निश्चित केली आहे.



पाचही आरोपी ताब्यात; जुन्या वादातून सूडबुद्धीने हत्या झाल्याचे उघड


समीर खान यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही हत्या सूडबुद्धीने झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे आरोपींची ओळख पटवली. खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास करून सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेतले. समीर खान यांची पत्नी सना खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हत्येमागे जुन्या वादाचे कारण आहे, समीर खान शहागंज मंडी परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान याने समीर खान आणि त्यांचे साथीदार शाहरुख यांच्यावर शस्त्राने हल्ला केला होता, ज्याचा गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी समीर यांनी आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला आणि शोएब काला या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि धमकीची दुसरी तक्रार दिली होती. याच जुन्या तक्रारीचा राग मनात धरून आणि सूडबुद्धीने, आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या पाच जणांनी एकत्र येत पती समीर खान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे सना यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना आज सकाळी (शनिवारी) कोर्टात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Nagpur BRICS Summit 2026 : नागपूरमध्ये ११ जुलैपासून ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक

- जागतिक परिवहन सहकार्य, शाश्वत विकास आणि नव्या तंत्रज्ञानावर होणार मंथन नागपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६

Maharashtra Rain : नाशिक, पुणे, जळगाव, सांगलीला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन