नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी ३३९ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान ५ विकेट राखत पूर्ण केले.
भारतीय महिला संघाच्या जेमिमा रॉड्रिग्जने ठोकलेल्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार केले आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. जेमिमाने या सामन्यात १२७ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला. त्याआधी स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांनीही चांगल्या खेळी केल्या.
३३९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची सुरूवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा केवळ १० धावा करून बाद झाली. यानंतर १०व्या षटकांत स्मृती मंधाना बाद झाली. तिने २४ धावा केल्या. दरम्यान, यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी १८्या षटकांत भारताची धावसंख्या १०० पार पोहोचवली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. मात्र ३६व्या षटकांत भारताला तिसरा झटका बसला तो हरमनप्रीतच्या रूपात. ती ८९ धावा करून परतली. यानंतर दीप्ती शर्माने चांगली खेळी केली. मात्र ४१व्या षटकांत ती २४ धावा करून बाद झाली. मात्र दुसरीकडे जेमिमा खेळतच होती. तिने ११५ चेंडूत शतक ठोकले. यानंतर ४६व्या षटकांत ऋचा बाद झाली. ती १६ बॉलमध्ये २६ धावा करून गेली. त्यानंतर हा विजय भारताच्या हातात होता.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर ३३९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. फीबी लिचफिल्ड आणि एलिसा हिली यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. लिचफिल्डने तुफानी फलंदाजी करत ११९ धावा केल्या. एलिस पेरी (७७ धावा) आणि ॲश्ले गार्डनर (६३ धावा) यांनीही मोठी भूमिका बजावली. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले