सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखिल उपस्थित राहणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली.
आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, "छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा निर्माण व्हावा ही सर्व जाती, धर्म, पक्ष या सगळ्यांनी इच्छा होती. तेव्हा सर्वपक्षीय सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे या सर्वांना आम्ही निमंत्रण दिलं आहे. नक्कीच हे सर्वजण येतील.'
असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का? आणि जरांगे आले तरी ते फडणवीस यांच्यासमोर नेमकं काय बोलणार, अशी चर्चा आता सोलापूरात चांगलीच रंगली आहे.