मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून, आता मुख्य पूल पाडण्यासाठी रेल्वेची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा सुरू आहे. पण पश्चिम रेल्वेच्या अवाजवी मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली. पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्याचे खोदकाम पूर्ण झाले असून, रेल्वेवर असलेल्या मुख्य रस्त्यावरील डांबर थर देखील काढण्यात आला आहे. डॉ. मुखर्जी यांनी प्रभादेवी ते परळ हा पायी प्रवास करून कामाची पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि आवश्यक सूचना दिल्या.
महारेल आणि पश्चिम रेल्वे वाद
एल्फिन्स्टन रोड पूल पाडण्याचे कंत्राट महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला (MRIDC/महारेल) मिळाले आहे. मात्र, पश्चिम रेल्वेने महारेलकडे ५९ कोटी रुपयांची मागणी केली आहे, जी अपेक्षित बजेटपेक्षा जास्त असून महारेलने ही मागणी अवाजवी असल्याचे स्पष्ट केले आहे. महारेलच्या मते, पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी सार्वजनिक वाहतुकीसाठी नियोजित बदल करण्याच्या हेतूने होत आहे, त्यात कोणतीही नवीन व्यावसायिक रचना नाही.
पाडकामातील विलंब पुलाच्या पुनर्बांधणीवर परिणाम करू शकतो, असे महारेलने म्हटले आहे. अहवाल पश्चिम रेल्वेकडे पाठवला असून आता मुख्यालयातून पाडकाम पूर्ण करण्यासाठी मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्य पूल पाडल्यावर सुमारे ९०० टन वजनाचा पोलादाचा भंगार (स्टेनलेस स्टील स्क्रॅप) तयार होणार आहे. तसेच पुलाच्या पोहोचरस्त्याच्या पाडकामातून १६,३१६ घनमीटर सिमेंट आणि काँक्रिटचा ढिगारा निर्माण होईल. या प्रकल्पातील उर्वरित काम खासगी कंत्राटदाराकडे सोपवले आहे.