मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा विद्युत तारा (केबल्स) तसेच जलवाहिनींसह अनेकांमध्ये गळतीसह बिघाड झाल्यास त्याची तातडीने दुरस्ती करण्यात येते. तसेच अनेकदा नवीन केबल्स टाकणे किंवा इतर युटीलिटीज टाकल्या जात असल्याने रस्ता तथा पदपथ खोदावी लागते. त्यामुळे खोदण्यात आलेला रस्ता तथा पदपथ पुन्हा आहे त्या स्थितीत बनवून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने यासाठी खोदण्यात आलेले चर बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय कंत्राटदारांची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता कंत्राटदारांची निवड करत २५७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यता आली आहे.
मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याच्या कामांसाठी फेब्रुवारी २०२२ रोजी ३८३ कोटी रुपयांच्या कामांसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यासाठी प्रत्येक महापालिका परिमंडळ निहाय नियुक्त केलेल्या सात कंत्राटदारामार्फत विविध कामांसाठी खोदण्यात आलेले चर बुजवण्याची कामे केली जात होती. मात्र, या नियुक्त कंत्राटदारांचा कालावधी तीन वर्षांचा म्हणजे २०२५ पर्यंत असला तरी प्रत्यक्षात मंजूर केलेल्या कामाचा निधी यापूर्वीच संपला गेला. मुंबईमध्ये सध्या गृहविभागाच्या माध्यमातून सीसी टिव्ही कॅमेरा बसवण्याचे काम हाती घेतले गेलेले असल्याने त्यासाठीच्या केबल्स टाकण्याचे काम लार्सन अँड टुब्रो अर्थात एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून सुरु आहे. महाराष्ट्र शासनासाठी मुंबईत राबवित असलेल्या सीसीटिव्ही फेज-२ प्रकल्पातंर्गत पूनर्भरणी शुल्क हा एल ऍन्ड टी या कंपनीला माफ करण्यात आला हा निधी संपल्याने सुमारे ५७३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्याचा घाट कंत्राटदारांनी घातला होता. त्यामुळे चर बुजण्याच्या कामांचे हे एकूण कंत्राट ९४१ कोटींवर पोहोचणार होते. परंतु अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी ही बाब अत्यावश्यक नसल्याने यासाठी नव्याने निविदा मागवून त्यासासाठी कंत्राटदारांची नेमणूक करता येवू शकते. त्यामुळे नव्याने निविदा मागवण्यासाठी १५ टक्क्यांपर्यंतचा निधीपर्यंतचा खर्च करण्यास मान्यता देत यासाठीची निविदा मागवण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार महापालिकेने नव्याने निविदा निविदा मागवल्या. दोन वर्षांकरता सुमारे प्रत्येक परिमंडळांमध्ये प्रत्येकी ४५ कोटी रुपये एवढी अंदाजित रक्कमेच्या आधारे मागवलेलया निविदेमध्ये प्रत्येक कंत्राटदारांनी सरासरी ३० ते ३२ टक्के कमी बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सात परिमंडळांमध्ये अंदाजित केलेल्या ३०० कोटी रुपये कंत्राट कामांच्या तुलनेत २५७ कोटी रुपयांची बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
चर बुजवण्यासाठी नव्याने नियुक्त कंपन्या आणि कंत्राट रक्कम
परिमंडळ १ : वरुण कंस्ट्रक्शन (३८.८५ कोटी रुपये)
परिमंडळ २ : डि.जे. इन्फ्रा(३७.०८ कोटी रुपये)
परिमंडळ ३: चिराग कॉर्पोरेशन(३१.०५ कोटी रुपये)
परिमंडळ ४: शाह अँड पारिख(३८.०० कोटी रुपये)
परिमंडळ ५: स्वस्तिक कंस्ट्रक्शन (४४.६५ कोटी रुपये)
परिमंडळ ६:मानसी कंस्ट्रक्शन (२८.१० कोटी रुपये)
परिमंडळ ७ :आर्मस्ट्राँग इंडिया (३९. ३७ कोटी रुपये)