भारताची जागतिक क्रमवारीत मोठी भरारी; एकूण वनक्षेत्रात ९व्या स्थानावर
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने भारताने मोठी मजल मारली आहे. अन्न आणि कृषी संघटना (FAO) यांनी बाली येथे प्रकाशित केलेल्या जागतिक वन संसाधन मूल्यांकन (GFRA) २०२५ नुसार, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारत जगात ९ व्या स्थानावर पोहोचला आहे.
याबद्दलची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 'X' वरील पोस्टमधून दिली. "सर्व भारतीयांसाठी ही आनंदाची बाब आहे," असे ते म्हणाले.
यापूर्वीच्या मूल्यांकनात भारत १० व्या स्थानावर होता. याशिवाय, वार्षिक वनक्षेत्र वाढवण्याच्या क्रमवारीतही भारताने जगभरात तिसरे स्थान कायम राखले आहे.
या प्रगतीचे श्रेय देताना मंत्री यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वन संरक्षण, वनसंवर्धन आणि समुदाय-आधारित पर्यावरण कृतींसाठी आखलेल्या धोरणांचे हे यश आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या 'एक पेड माँ के नाम' या आवाहनामुळे देशातील नागरिकांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे हरित आणि टिकाऊ भविष्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.