नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात असून, त्यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल २० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहे. या कारवाईत एका भारतीय तस्कराला अटक करण्यात आली आहे. तस्कराची चौकशी सुरू आहे.
बीएसएफच्या ३२व्या बटालियनने ही यशस्वी कारवाई हरांदिपूर बीओपी (Border Outpost) परिसरात केली. दलाला मुस्लिमपारा गावातील एका भारतीयाने सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती दिली. बांगलादेशमधून २० किलो सोनं बेकायदेशीररत्या भारतात आणलं जात होतं. ठोस माहिती मिळताच सीमा सुरक्षा दलाने गस्त वाढवली आणि सावध राहून तस्कराला सोन्यासह पकडले.
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास, हरांदिपूर परिसरातील दाट बांबूच्या झाडांजवळ एक संशयास्पद व्यक्ती फिरताना जवानांना आढळली. जवानांनी तात्काळ त्या भागाला वेढा घालून संशयितास अटक केली. अटक केल्यानंतर झालेल्या झडतीदरम्यान त्या व्यक्तीकडून एक प्लास्टिकची पिशवी सापडली. पिशवी उघडली असता त्यामध्ये २० सोन्याची बिस्किट्स असल्याचे आढळले. या बिस्किट्सचे एकूण वजन सुमारे २० किलो असून, बाजारमूल्य अंदाजे २.८२ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.
बीएसएफने अटक केलेल्या व्यक्तीस हरांदिपूर बीओपीमध्ये आणून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आरोपीस आणि जप्त केलेलं सोनं संबंधित कस्टम विभाग व अन्य तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या अनेक भागांमध्ये सोनं, ड्रग्स, गुटखा यांसारख्या वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. यामुळे बीएसएफसाठी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. मात्र, बीएसएफच्या सतर्कतेमुळे अशा अनेक प्रयत्नांना अलीकडच्या काळात अपयश आले आहे. बीएसएफने स्थानिक नागरिकांना आवाहन केलं आहे की, सीमेवर काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी