मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत, मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपटांना चांगले दिवस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगाशीलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आत्ताचा दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी येथे चित्रपट मुहूर्तमेढ रोवली.
आजपर्यंतच्या काळात असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्व सामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen - z) भावणारे व आवडणारे चित्रपट येण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहेत, सायबर गुन्हे प्रकारांवर आळा घालण्यासाठी अशा विषयांवर आधारित कथेवर आधारित सिनेमे निर्माण केले जावेत. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड अशा बाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात ‘डिजिटल वॉरफेअर’मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.