मुंबई : मुंबईच्या ‘हाय-स्पीड’ कोस्टल रोडवर सुरूवातीपासूनच वाहनचालकांचा वेगावर ताबा सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. फक्त २४ दिवसांत तब्बल १६ हजार ई-चलनांची नोंद झाली असून, रोज सरासरी ४६५ उल्लंघनं होत असल्याचे वाहतूक विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत नोंद झालेल्या प्रकरणांत ११,१७३ वाहनचालकांवर वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल कारवाई करण्यात आली. हे सर्व चलनांपैकी तब्बल ७२ टक्के आहे. याशिवाय ४,४२३ वाहनचालकांवर बस लेनचा वापर केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. एका वाहनाचा कमाल वेग १३२ किमी प्रतितास इतका नोंदवण्यात आला, जो प्रवाशांच्या जीवितासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो.
कोस्टल रोडवरील वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (ANPR) कॅमेरे बसवण्यात आले असून, या कॅमेऱ्यांतूनच हे सर्व उल्लंघन पकडले गेले. वाहतूक विभागाने वेगमर्यादा मोडल्यास २,००० रुपये दंड, तर बस लेनमध्ये घुसखोरी केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ५०० रुपये आणि वारंवार उल्लंघन झाल्यास १,५०० रुपयांचा दंड निश्चित केला आहे. मुख्य रस्त्यावर वेगमर्यादा ८० किमी, बोगद्यांत ६० किमी आणि इंटरचेंजवर ४० किमी प्रतितास अशी मर्यादा घालण्यात आली आहे.
संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी स्पष्ट केले की, “हा रस्ता हाय-स्पीड कॉरिडॉर असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांवर एफआयआर दाखल होऊ शकतो तसेच त्यांची वाहने देखिल जप्त केली जाऊ शकतात.”
या मार्गावरील सात ANPR कॅमेरे वाहनांवर लक्ष ठेवत आहेत. चार कॅमेरे वरळीतील बडोदा पॅलेसजवळ तर तीन कॅमेरे दुहेरी बोगद्यांत बसवण्यात आले आहेत. रात्री उशिरा आणि पहाटे, जेव्हा रस्त्यावर कमी वाहतूक असते, तेव्हा वेगमर्यादा मोडण्याचे प्रकार सर्वाधिक दिसून येतात.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी लॅम्बोर्गिनी, फेरारीसारख्या सुपरकार्सने या रस्त्यावर शर्यत लावल्याच्या आणि प्रचंड आवाज निर्माण केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ब्रीच कँडी रहिवासी मंचाच्या नंदिनी छाबरिया यांनी सांगितले की, “आमच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवली असून, मागील दोन आठवड्यांत ही समस्या बरीच आटोक्यात आली आहे.”
मुंबईकरांना दिलासा देणारी ही बाब असली तरी कोस्टल रोडवरचा वेगाचा वेडेपणा अजूनही गंभीर आव्हान म्हणून उभे आहे. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या बेफाम धावपट्टीवर शिस्त प्रस्थापित करणं हेच पोलिसांसमोरचं खरं आव्हान ठरणार आहे.