Sunday, September 28, 2025

Mithun Manhas: अनपेक्षित! मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड

Mithun Manhas: अनपेक्षित! मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी एक आश्चर्यकारक नाव समोर आलं आहे. दिग्गजांची नावं चर्चेत असताना जम्मू-काश्मीरचा माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास (Mithun Manhas) यांनी आज (२८ सप्टेंबर) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) बिनविरोध विजय मिळवत हे प्रतिष्ठेचं पद पटकावलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केलं आणि अधिकृत घोषणा केली.

मिथुन मन्हास यांनी क्रिकेटचा प्रवास जम्मू-काश्मीर संघाकडून अंडर-१५ पासून सुरू केला. त्यानंतर अंडर-१६ आणि अंडर-१९ स्तरावर सातत्याने चमक दाखवत त्यांनी १९९५ मध्ये तब्बल ७५० धावा करून देशातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून ओळख मिळवली. पुढे ते जम्मू-काश्मीर संघाचे कर्णधार झाले आणि त्यांच्या कामगिरीमुळे उत्तर विभागाच्या संघात निवड झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दिल्लीला स्थायिक झाले आणि दिल्लीच्या प्रीमियर स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्यांनी आपली छाप पाडली. १९९७ मध्ये रणजी ट्रॉफीत दिल्ली संघाकडून पदार्पण करून त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरीने मधल्या फळीत आपले स्थान पक्कं केलं.

२००१-०२ हंगामात रणजी ट्रॉफीत १००० हून अधिक धावा करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यानंतर २००६ ते २००८ या काळात त्यांनी दिल्ली रणजी संघाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या कर्णधारपदाखाली दिल्लीने २००७-०८ रणजी ट्रॉफी जिंकली. हे दिल्लीचं सोळावं विजेतेपद ठरलं.

रणजीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून त्यांनी आयपीएल पदार्पण केलं. त्यानंतर पुणे वॉरियर्स इंडिया आणि २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडूनही ते खेळले. २०१७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून नवी वाटचाल सुरू केली. किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांसोबत सपोर्ट स्टाफमध्ये काम केलं. पुढे ते गुजरात टायटन्सच्या प्रशिक्षक पथकातही सहभागी झाले.

२०१३ मध्ये मन्हास जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक झाले. राज्यातील क्रिकेटची पायाभरणी मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. खेळाडू घडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. बीसीसीआयच्या सुधारित घटनानुसार आता अशा निवडींना कोणताही विरोध नसतो आणि बोर्डाच्या मते, क्रिकेटपटूंनीच बोर्डाचं नेतृत्व करावं. याच परंपरेत मन्हास यांची निवड झाली आहे. याआधी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलं होतं.

एका साध्या घरातून क्रिकेटच्या मैदानात झुंज देत वर आलेल्या आणि दिल्ली रणजी संघाचं नेतृत्व करत आयपीएलपर्यंतचा प्रवास केलेल्या मन्हास यांची आता बीसीसीआय अध्यक्षपदी झालेली निवड खरंच अनपेक्षित ठरली आहे. भारतीय क्रिकेटच्या धोरणांमध्ये त्यांचा अनुभव आणि दृष्टीकोन किती बदल घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.

Comments
Add Comment