बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेलीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर दंगल भडकली होती. नमाज अदा करुन आलेल्यांनी हिंसा केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन मौलाना तौकीर रझा याच्यासह आठ जणांना अटक केली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बरेलीत ४८ तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले. कानपूरमध्ये तणाव निर्माण झाला. पाठोपाठ बरेलीत हिंसा झाली. पोलिसांवर दगडफेक झाली. गोळीबार झाला. पोलिसांनी कठोर कारवाई करुन कायदा सुव्यवस्था सुरळीत राखली.
बरेलीती हिंसेप्रकरणी आयएमसी प्रमुख मौलाना तौकीर रझाला अटक करण्यात आली. याआधी २०१० मध्ये बरेलीत झालेल्या दंगली प्रकरणीही मौलाना तौकीर रझा आरोपी आहे. अद्याप त्याच्या विरोधातील २०१० च्या दंगलीशी संबंधित खटला प्रलंबित आहे. ज्ञानवापी मंदिरात पूजा पुन्हा सुरू झाल्यानंतरही मौलाना तौकीर रझाने चिथावणी देत आंदोलन केले होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी चिघळला होता. मौलाना तौकीर रझा हा अनेकदा तणाव निर्माण करणारी वक्तव्य केल्यामुळे प्रकाशझोतात राहिला आहे. सातत्याने कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी काम केल्याचे आरोप मौलाना तौकीर रझावर आहेत.
शुक्रवारी घडलेल्या घटनांनंतर शनिवारी जिल्हा दंडाधिकारी अविनाश सिंह यांनी बरेली शहराचा दौरा केला. विविध भागांना भेट दिली आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी लोकांना शांतता आणि सुव्यवस्थेचे आश्वासन दिले. तपासणीनंतर त्यांच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.
शुक्रवारच्या घटना एक सुनियोजित कट होता. उत्तर प्रदेशच्या विकासाचा वेग वाढत आहे. या प्रगतीत अडथळा आणण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचे दिसत आहे. लोकांना चिथावणी देऊन हिंसाचार भडकवण्यात आला आहे. या घटना घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे; असे बरेलीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश सिंह म्हणाले.