पंतप्रधान मोदींच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी 4G सेवेचे लोकार्पण


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी नऊ हजार तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘4G’ नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील ९० टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजिटल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.


बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यातील नऊ हजार तीस टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील २४ हजार ६८० हजार गावांना या टॉवर्सच्या माध्यमातून ‘4G’ नेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसित करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्त्वाचे आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता २१ व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हिटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी 4G टॉवर्सची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.


सुरूवातीला स्वतःचे 4G तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, तेजस, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी देशी तंत्रज्ञानावर आधारित 4G तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यतेद्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही 4G कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये 5G मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्यानंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे; असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘4जी’ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्त्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागाला, ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन), पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे सहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेल, असेही शिंदे म्हणाले.


पंतप्रधान यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी 4जी तंत्रज्ञान फक्त 22 महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंग, संरक्षण क्षेत्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण 5G आणि 6G कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागात जाणार असून २५ हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्या म्हणाल्या.


याआधी प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात नऊ हजार १३९ टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजिटल भारत निधी 4जी प्रकल्पांतर्गत दोन हजार १७४ टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने दोन हजार ७५१ टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्था, टॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात ९३० अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.


Comments
Add Comment

UPSC : UPSCची मोठी कारवाई! AI तपासणीत परीक्षेपूर्वीच ६०० बनावट अर्ज बाद

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) २०२६ अधिक पारदर्शक (Transparent) आणि

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र