मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवत गेल्या काही दिवसांत तब्बल २६३ अवैध वाहनांवर कारवाई करत ₹३.८८ लाखांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरकारने ठरवलेल्या नियमानुसार, ॲप-बेस वाहनचालकांकडे आवश्यक परवाने असणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून निश्चित दराप्रमाणेच भाडे आकारणे गरजेचे आहे. तसेच वाहनचालकांना मिळणाऱ्या कमाईपैकी किमान ८०% हिस्सा देणे आवश्यक आहे.
दराच्या अटी आणि नियमानुसार सेवा देणे बंधनकारक
मुंबईत अनेक वाहन चालक ठरविलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यानंतर प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली आहे. काही चालक विना परवाना वाहतूक करत असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांवर एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई सांताक्रूझ, अंधेरी आणि मैदान पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे.
अधिकृत दर काय आहेत?
ऑटो रिक्षा – पहिल्या १.५ किमीसाठी ₹२६, त्यानंतर प्रति किमी ₹२०.६६
काळी-पिवळी टॅक्सी – पहिल्या १.५ किमीसाठी ₹३१, त्यानंतर ₹२०.६६ प्रति किमी
AC वाहनांसाठी – १०% अधिक भाडे
इलेक्ट्रिक दुचाकी / बाईक टॅक्सी (महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम २०२५) – पहिल्या १.५ किमीसाठी ₹१५, त्यानंतर ₹१०.२७ प्रति किमी
'ॲग्रिगेटर्स पॉलिसी' लागू
राज्यात ॲप-आधारित सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ॲग्रिगेटर्स पॉलिसी' लागू करण्यात आली आहे. परवाना नसलेल्या कंपन्या किंवा चालकांवर याअंतर्गत कारवाई होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाद्वारे बेकायदेशीर सेवा देणाऱ्या वाहनचालकांना थेट इशारा दिला आहे की, त्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक दंड आणि अन्य कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.