अबुधाबी : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १३३ धावा केल्या आणि पाकिस्तानने १२ चेंडू शिल्लक असताना हे आव्हान सहज पार केले.
श्रीलंकेच्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी ४५ धावांची सलामी भागिदारी केली. पण महिश थीकशनाने दोन्ही सलामीवीरांना सलग बाद करून श्रीलंकेला पुन्हा सामन्यात आणले. सॅम अयुब आणि सलमान आगा यांनाही लागोपाठ बाद करण्यात आले.
पाकिस्तानने १२ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. या कठीण परिस्थितीत मोहम्मद हरिसने १३ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी ३२ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि महेश थीकशनाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिस एकही धाव न काढता बाद झाला.त्यानंतर पथुम निस्सांका ८ धावा काढून बाद झाला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने ५० धावांची झुंजार खेळी केली. कर्णधार चरिथ असलंकाने २० धावा, चमिका करुणारत्नेने १७ धावा आणि कुसल पेरेला आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हरिस रौफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अबरार अहमदनेही एक विकेट घेतली.
या विजयामुळे पाकिस्तानची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता जिवंत आहे. दरम्यान, सुपर ४ टप्प्यात श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. क्रिकेट चाहते आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत, जी फक्त तेव्हाच शक्य होणार आहे. जेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी होईल.