Wednesday, September 24, 2025

Ajit Pawar : अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांकडून मदतीचा मोठा दिलासा; अटसुद्धा रद्द

Ajit Pawar : अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांकडून मदतीचा मोठा दिलासा; अटसुद्धा रद्द

धाराशिव : राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत कार्याला गती देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश ते देणार आहेत. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे या देखील जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्या पूरग्रस्त आणि पिकांचे नुकसान झालेल्या गावांना भेट देणार आहेत. शेतकऱ्यांचे ऐकून घेऊन मदत तातडीने पोहोचवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

परंडा, भूम, वाशी, करमाळा परिसरात अजित पवारांची उपस्थिती

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब या भागांना भेट देत पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून पाहिली. यानंतर अजित पवार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात दाखल झाले. येथे त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, अजित पवार परंडा तालुक्यातील देवगाव, भूम तालुक्यातील वालवड आणि वाशी तालुक्यातील पारगाव या गावांमध्येही भेट देणार आहेत. पूर परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे संकेत त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोरटी गावाला भेट देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांनी काळजी करू नये. निधीची कोणतीही चिंता नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” अजित पवारांनी सांगितले की, पंचनामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि मदत देताना ६५ मिमी पावसाची अट ठेवली जाणार नाही. यावेळी शेतकऱ्यांकडून कांदा, भाजीपाला आणि इतर पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. “शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व आम्ही करू. आधी आम्ही पाहणी करत आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आहोत,” अशा आश्वासक शब्दांमध्ये अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

पंकजा मुंडे परतूर तालुक्यात

अशातच, परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट देण्यासाठी पंकजा मुंडे आज पोहोचणार आहेत. गोदावरी नदीच्या पुरामुळे या गावाला मोठा वेढा बसला असून, अडीच ते तीन हजार नागरिक रात्रीच शेजारच्या लोणी गावात स्थलांतरित झाले होते. पंकजा मुंडे गावातील परिस्थितीची पाहणी करतील आणि नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी त्या नुकसानीची सविस्तर माहिती गोळा करून, शासकीय मदतीच्या व्यवस्थेबाबत निर्णय घेतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >