परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल.


मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.


या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.


बैठकीला बृहन्मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी आणि पोलिस आयुक्त भरती यांनी सादरीकरण केले.

Comments
Add Comment

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

Rain Update : राज्यात २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, मुंबईत मोठ्या संख्येने भाविकांनी शहरातील प्रमुख मंदिरांना भेट दिली,

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आला उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे हैदराबाद