एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड
जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झिरो बॅलेन्स खात्यांमधूनही पैसे निघू लागल्याची माहिती आसपासच्या परिसरात पसरली. याचा फायदा घेण्यासाठी अनेकजणांनी रातोरात पोहोचून एटीएमबाहेर रांगा लावल्या. झिरो बॅलेन्स अकाऊंट असलेल्या अनेकांनी एटीएममधून पैसे काढले. याची माहिती मिळताच पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे.
बँक खात्यात पैसे नसले तरीही एसबीआयच्या एटीएममधून रोख काढता येत असल्याचा मेसेज १७ सप्टेंबरच्या रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. बँकेंच्या अनेक ग्राहकांना एसएमएसवरून ही माहिती मिळाली. यानंतर अलवर आणि आसपासच्या परिसरातील एसबीआयच्या अनेक एटीएमबाहेर गर्दी जमली. बँक प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवताच त्यांनी अनेक एटीएम बंद केले. काही एटीएमच्या जवळ पोलिसांना काही संशयास्पद तरुण दिसले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्रभरात जवळपास ५० तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सगळ्यांचे मोबाइल आणि वाहने जप्त केली आहेत.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या संकेतस्थळावर काहीतरी तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याचा फायदा उचलला. पोलिसांनी किमान २० एटीएम बंद केले. पोलीस रात्रभर एटीएमच्या आसपास तैनात होते. या सगळ्या प्रकरणावर एसबीआयचे अधिकारी मौन बाळगून आहेत. एसबीआयकडून या सगळ्या घडामोडींबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. बँक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तांत्रिक समस्येचा फायदा उचलण्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.