५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास
गणेशोत्सवात एसटीचे उत्पन्न २३ कोटी ७७ लाख रुपये!
मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात मुंबई, ठाणे व पालपर क्षेत्रांतून ५ लाख ९६ हजारांहून अधिक कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. आपापल्या गावी, वाड्या-वस्त्यांवर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे चालक-वाहक, त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक-अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
यावर्षी गणेशोत्सवात एसटीतर्फे कोकणवासीयांसाठी ५ हजार जादा एसटी बसची सोय करण्यात आली होती. या बसच्या १५ हजार ३८८ फेऱ्यांमधून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. एसटी महामंडळाने प्रवाशांची सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने योग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडून काढत यावर्षी ५ हजार बसद्वारे ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली.
भाडेवाढ मागे घेतल्याने गट आरक्षणातील प्रवाशांना दिलासा
गणपती विशेष जादा बस चालवण्यासाठी राज्यातील इतर विभागातून क्स मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथील विभागात पाठवण्यात येतात. त्यानंतर या बसचे गट आरक्षण झाल्यानंतर, त्या परतीचा प्रवास करताना रिकाम्या येत होत्या. त्यामुळे महामंडळाचा इंधनावर जादा खर्च होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी ३० टक्के जादा भाडेवाढ केली होती. मात्र या निर्णयाबाबत प्रवासांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर गौरी-गाणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला.