वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी


मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयादरम्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून आकाशमार्गिकेची पुनर्बांधणी केली जात आहे. या आकाशमार्गिका कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आकाश मार्गिकेचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी आकाश मार्गिका नागरिकांच्या वापरासाठी खुली व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. आकाश मार्गिकेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पुढील ३ महिन्यांत पूर्ण करावीत. कामाच्या विविध टप्पानिहाय कालमर्यादा निश्चित करून दिल्या आहेत. या कामात कोणताही विलंब होता कामा नये. विहित कालमर्यादेचे पालन न केल्यास कंत्राटदारावर सक्त कारवाई करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.


मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामामार्फत विविध पूल प्रकल्प, आकाश मार्गिका उभारण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल, वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. अॅनी बेझंट मार्ग यांच्या दरम्यानच्या नाल्यावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वांद्रे येथील आकाश मार्गिका या कामांची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन केली. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


मिठी नदी पात्र रुंदीकरण अंतर्गत वांद्रे ते धारावी येथे पुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मिठी नदीचा प्रवाह वेगाने समुद्रात मिसळावा, यासाठी नदीच्या समुद्र संगम स्थळी मुखाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. पाण्याच्या प्रवाहाला कमीतकमी अडथळा निर्माण व्हावा या उद्देशाने धारावी येथील उड्डाणपुलाची पुनर्बांधणी दोन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील पुलाच्या दक्षिणेकडील दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होतील. या नव्या मार्गिकांमुळे माहीम कॉजवेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार असून वाहतुकीचा वेग, सुलभता आणि सुरक्षितता वाढणार आहे.


प्रकल्पस्थळी उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या पुलाचे कार्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहेत. हे काम १८ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पण, काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी काम पुर्णत्वाचा कालावधी निश्चित करावा. यासोबतच कामांची ठोस कालमर्यादा आखून वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच इतर अनुषंगिक आवश्यक परवानग्या पूर्वीच प्राप्त कराव्यात. काम सुरू झाल्यानंतर कालावधी वाढू नये आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


वरळी नाका, महालक्ष्मी व लोअर परळमधील वाहतूक कोंडी फुटणार


वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. अॅनी बेझंट मार्ग यांच्या दरम्यानच्या नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामाची पाहणी बांगर यांनी केली. या पुलाच्या संरेखनामुळे दोन्ही प्रमुख मार्गांना थेट जोडणी मिळून नवीन वाहतूक दुवा निर्माण होणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर वरळी नाका, महालक्ष्मी व लोअर परळ परिसरातील वाहतुकीवरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुलभ, जलद व सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत या पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बांगर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस