अमावस्या आणि पौर्णिमेला जसा चंद्र आणि समुद्रावर परिणाम होतो तसाच माणसाच्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय कालगणनेमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताचा विचार केला जातो.येथे मध्यरात्रीच्या बारापासूनचा कालावधी विचारात घेण्यात येत नाही. भारतीय कालगणनेमध्ये ३० मुहूर्त, २४ तास यांचे वैशिष्ट्यपूर्ण गणितीय समीकरण आहे. यातही शुभाशूभ मुहुर्ताचा विचार करण्यात आला आहे. जीवनशैलीच्या व्यवस्थापनामध्ये निसर्गाचा विचार करण्यात आला आहे.
उज्जैनला महत्त्व
प्राचीनकाळी उज्जैन हे कालगणनेच्यादृष्टीने महत्त्वाचे केंद्र होते, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. वैदिक गणित आणि पंचांगाच्या अचूकतेचा आता जगाने स्वीकार केला आहे. ज्या ठिकाणी संगणक अपयशी ठरते तिथे खगोलज्योतिषशास्त्र हे अधिक बिनचूक ठरल्याचे दिसून येते. आता भोपाळमध्ये या वैदिक घड्याळाची स्थापना करून गौरवशाली भारतीय परंपरेला उजाळा देण्यात आला आहे, असे यादव यांनी नमूद केले. राजा विक्रमादित्याची कारकीर्द हे भारताचे सुवर्णयुग म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या काळात कालगणनेचे हे घड्याळ तयार करण्यात आले. पंचांग, तिथी, नक्षत्र, योग, दिवस, महिना, व्रत आणि उत्सव यांच्या माहितीबरोबरच साधारणपणे ३१७९ या विक्रम संवतापासूनच्या सणावारांची मागील सात हजार वर्षांतील माहिती याद्वारे मिळू शकते.