कराची: रविवारी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की याचे झटके दिल्ली एनसीआरमध्ये देखील जाणवले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. ज्यात २० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बचावकार्य सुरू आहे. मात्र दुर्गम भागात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. एनसीआर रहिवाशांनी सांगितले की, भूकंपाचे जोरदार धक्के रात्री उशिरा जाणवले. इमारती हादरल्या, ज्यामुळे लोकं घराबाहेर मोकळ्या जागी पळाले.
भूकंपाचे केंद्र कुठे होते?
यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील जलालाबादच्या पूर्व-ईशान्येस २७ किमी अंतरावर ८ किमी खोलीवर होते. भारतीय वेळेनुसार रात्री १२.४७ वाजता हे धक्के जाणवले. सुमारे २० मिनिटांनंतर, भूकंपाचा आणखी एक धक्का जाणवला, ज्याची तीव्रता ४.५ इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपाच्या हालचालींमध्ये चिंताजनक वाढ
अलिकडच्या काळात अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारील हिमालयीन प्रदेशात भूकंपाच्या हालचालींमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे. हा नवीनतम भूकंप या प्रदेशात होणाऱ्या भूगर्भीय हालचालींची आणखी एक आठवण करून देतो. शास्त्रज्ञ या वारंवार होणाऱ्या भूकंपांना भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या मंद पण सलग होणाऱ्या टक्करीशी जोडत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, लाखो वर्षांपूर्वी हिमालयाला आकार देणाऱ्या हिमालयाखाली पृथ्वीच्या आत असलेल्या दोन प्लेट्स अजूनही या भूभागाला अस्थिर करत आहेत.