मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे
कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. असा हा पवित्र, मंगलमय, मंगलमूर्ती लाडका बाप्पा, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, त्याचे होणारे आगमन म्हणजे उत्साहाची जणू पर्वणीच!
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता अवघ्या दीनांचा नाथा बाप्पा मोरया रे असे भक्तीत लीन होणारे, तल्लीन होणारे गणेश भक्त त्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. बाप्पा तुम्ही या, येताना भरपूर सुखच सुख घेऊन या आणि विघ्नहर्ता म्हणून आमच्या साऱ्या सृष्टीच्या सगळ्या विघ्नांचा नाश करा. कारण तुम्ही दीनांचे नाथ आहात! एवढं मोठं तुमचं पोट आहे त्यामध्ये आमच्या चुका सामावून घ्या. माफ करा आम्हाला आणि दरवर्षी आमच्या भेटीसाठी पुन्हा पुन्हा या! आम्ही स्वागतासाठी सज्ज आहोतच. भरजरी पितांबर सोनेरी आणि जरीने सजवलेला पितांबर किंवा धोतर, साजरा सुपासारखे कान, मोठ्ठं पोट लंबोदर, वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड, गोबरे गाल, ढेरी, सुंदर जानवं नेसलेलं भरजरी पितांबर, मखमली शेला, डोक्यावरच्या मुखवट्यामध्ये हिरे, जडजवाहीर, चकमक करतात. हातात असणारी अस्त्रे सर्व देवांची शस्त्रे ती त्याच्याच हाती असतात. शंख, पद्म, श्री सुदर्शन चक्र, गदा, मोदक, जास्वंद, किती किती सांगू.
आवडता बाप्पा येणार! म्हणून धूप, कापूर दरवळतात. सुगंधाचे सुग्रास पूजन आणि देवाचं मनमोहक रूप भक्तीभावाने तल्लीन होणारे वातावरण. सुख, शांती, समृद्धी आत्मबल देणारे आणि बुद्धीदायक, बुद्धी दाता श्री गणेशाचे घराघरात, मनामनात आगमन ही सात्त्विकता आनंदाला उधाण आणते. भक्ती, ओढ, श्रद्धा यातून उतरतो तो जल्लोष. ढोल, ताशे, नगारे, डीजे, टाळ मृदंग, ढोलकी मिरवणूक खूप काही देऊन जातो. रांगोळ्या, रंगीबेरंगी सुवासिक फुले, सजावट, रोषणाईने अवघे वातावरण फुलून जाते. गणेशोत्सवाचे संपू्र्ण दिवस हे गजबजाट, जल्लोष, संगीतमय वातावरण असते. मोठ्या गणपतींच्या तासनतास चालणाऱ्या आरत्या महाआरत्या आणि त्यात तल्लीन होणारे, बाप्पाच्या स्वाधीन झालेले भक्तजन बाप्पाच्या पायी लीन होतात. पूजनीय, चैतन्यपूर्ण, स्फूर्तिदायी, उत्साहवर्धक भक्तिमय आनंदात नाहून निघतात. गणेश चतुर्थीच्या वेळी विविध कार्यक्रमांची आखणी होते.
सार्वजनिक काही मंडळांमध्ये प्रबोधनाचे कार्य देखील घडते. अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात. कारण लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यामागील हेतू हाच होता की, सामाजिक ऐक्य, समता, बंधुता, एकता आणि धार्मिकता त्यातून सांस्कृतिक कार्य घडावे. धर्म, संस्कृती, परंपरा टिकाव्यात आणि प्रबोधन घडावे. काही गणेशोत्सव मंडळातून तर संदेश अतिशय प्रबोधनाचे असतात. त्यातून जनजागृती होते, समाजसेवा फुलते. वक्तृत्व, निबंध, खेळ, हस्ताक्षर स्पर्धा, पाककला, कॅरम, बुद्धिबळ, संगीत, नाट्य, नृत्य, संगीतखुर्ची, वेशभूषा, चित्रकला विविध स्पर्धांतून सुप्त कलागुणांचा विकास होतो. जाणीव, जागृती लोकहिताची कार्य एकजुटीने साकारली जातात. त्यासाठी सामाजिक विषयांना वाचा फोडणारे प्रबोधनात्मक कार्य देखील घडून आणले जाते. विविध प्रकारचे बोधात्मक असे देखावे देखील आखले जातात. बाप्पांचे आगमन तनमनाला फुलवून जाते. दहा दिवस बाप्पा सुवासिक धूप, कापूर, उदबत्ती, फुलांची आरास, अनेकविध नैवेद्यांचा आस्वाद घेऊन काही बाप्पा दीड दिवस, ५ दिवस, ७ दिवस तर काही अनंत चतुर्दशीला निरोप घेतात. तेव्हा मात्र सर्वांचे डोळे पाणावले जातात आणि एकच वाक्य सर्वांच्या मुखी असते. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या...