चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आणि महामार्गाची विशेष पाहणी केली जात आहे. यादरम्यानच एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी येथील दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल अचानक खचला असल्याचे वृत्त आले आहे. तब्बल १९६५ साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे खचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील ५० वर्ष जुना असलेला पिंपळी नदीवरील पूल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. या पुलाच्या काही भागांना तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची पाहणी केल्यानंतर कोणताही मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे दसपटी विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पूल पिंपळी गाणे आणि खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणारा असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने मोठे गैरसोय होत आहे.