जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केळीचे दर घसरल्यानंतर रावेर तालुक्यातील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन केळी दरवाढीसंदर्भात बऱ्हाणपुरच्या जिल्हा प्रशासनाशी तातडीने चर्चा करावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज भाव जाहीर करत असल्या, तरी व्यापारी वर्ग मात्र मध्यप्रदेशातील बुरहानपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांना प्रमाण मानतात. इतकेच नव्हे तर देशभरातील व्यापारी देखील बऱ्हाणपूरच्या केळी भावावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे बऱ्हाणपूरमध्ये केळी भावात थोडासा चढ-उतार झाला तरी त्याचे पडसाद थेट देशभर उमटतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत बऱ्हाणपूर बाजार समितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाव मनमानी पद्धतीने केव्हाही वाढविणे किंवा अचानक कमी करणे, असे व्यवहार तिथल्या यंत्रणेकडून सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वी केळी दराला क्विंटलमागे २ हजाराहून अधिकच दर मिळत होता. मात्र आता केळीचे दर ७०० ते ८०० रूपयांनी घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडीमागे (१५० क्विंटल) एक लाख रूपयांपेक्षा जास्त आर्थिक झळ बसली आहे. भाव वाढत असताना शेतकरी आणखी चांगल्या भावाच्या आशेने इतके दिवस केळीची कापणी करत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात भाव कमी झाल्यानंतर शेतकरी आता आणखी भाव कमी होण्याच्या भीतीने केळी कापणीसाठी घाई करू लागले आहेत. दरम्यान आता रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केळी दरवाढीसंदर्भात बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यानुसार लवकरच ही बैठक होणार असून, त्यावर केळीच्या दरासंदर्भात काही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या साखळीवर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.