निवडणूक आयोगाची चपराक

सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात वितुष्ट आले, ते अपरिहार्य आहे. पण राहुल गांधी यांनी सध्याच्या भाजप सरकारविरोधात जो पवित्रा घेतला आहे आणि सातत्याने ते एकच बोंब ठोकत आहेत, की मतचोरी झाली. त्यांचे साथीदार तेजस्वी यादव जे, की ज्यांचे वडील भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसले आहेत. राहुल स्वतःही त्यांच्या मातेबरोबर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपांचा सामना करत आहेत आणि सध्या पॅरोलवर आहेत. असो. पण सध्या राहुल यांनी निवडणूक आयोगाविरोधात जी मोहीम उघडली आहे ती त्यांची ढासळलेली मन:स्थिती उघड करणारी आहे. कारण राहुल यांनी सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप केले असले तरीही काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांचे दावे साफ फेटाळून लावलेच, पण राहुल यांनी सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावे अथवा त्यांनी देशाची माफी मागावी असा आदेश दिला आहे. राहुल यांचे लहान मुलासारखे वागणे आहे. लहान मुले जसे दारावरची बेल वाजवून पळून जातात आणि दार उघडले की कुणीही दिसत नाही तसेच आहे. निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केला आहे, की भाजपबरोबर हातमिळवणी करून आयोग मतचोरीच्या प्रकारांना चालना देत आहे. याचा ज्ञानेश कुमार यांना संताप आला आणि आता त्यांनी राहुल यांना सात दिवसांची मुदत दिली. अर्थात राहुल त्यांना उत्तर देणार नाहीत कारण त्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत आणि त्यांना सत्याला सामोरे जायची तयारीही नाही. उलट आयोग आणि भाजप यांच्यावर वाट्टेल तसे आरोप करायचे आणि पळून जायचे हेच त्यांचे धोरण राहिले आहे.


राहुल यांनी लोकशाहीच्या गांभीर्यालाच हरताळ फासला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे आणि येथील कोट्यवधी लोकांच्या मतदानाच्या हक्काबाबत राहुल यांनी शंका उपस्थित करून लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल यांच्यासारख्या व्यक्ती आज देशाच्या विरोधी नेते पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी शंका उपस्थित केल्या, की देशविरोधी शक्तींना त्याचा फायदा होतो हे सत्य आहे. राहुल यांच्या आरोपांकडे पाहिले तर त्यांच्या आरोपांमध्ये जराही तथ्य नाही. त्यांनी वास्तविक काँग्रेस त्यांच्यासारख्या बालबुद्धीच्या पंचावन्न वर्षांच्या नेत्याच्या चाळ्यामुळेच आज गटांगळ्या खात आहे. पण राहुल यांना ती समज नाही. त्यांचे सल्लागार तर त्यांच्यापेक्षाही बालबुद्धीचे आहेत. तरीही राहुल यांचे बालिश आरोप चालूच आहेत आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन त्यांना तंबी दिली. २०१९ मध्येही राहुल यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम यंत्रांवर आक्षेप घेतला होता. पण तपासणी करण्यासाठी बोलावले असता सर्वांनी पळ काढला. निवडणूक आयोग पक्षपाती आहे असा राहुल यांचा नेहमीचा आरोप आहे. पण जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा मात्र आयोग चांगला होता. एस. एल. शकधर यांच्यासारखे आयुक्त, तर इंदिरा गांधी यांची खासगी चाकरी करत असत. पण हा इतिहास राहुल यांनी जरा तपासून पाहावा अथवा आपल्या वरिष्ठांना विचारून घ्यावा. मग त्यांना आयोगावर आपले आरोप किती बिनबुडाचे आहेत हे समजेल. शकधर प्रभृती वगैरेंनी काँग्रेसची चाकरी केली. शेषन आल्यावर खऱ्या अर्थाने लोकांना निवडणुकीचे महत्त्व आणि आपल्या मताची किंमत समजली. हा इतिहास काही फार जुना नाही. ज्ञानेश कुमार यांनी राहुल यांचे आरोप बिनबुडाचे आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे आणि राहुल यांना सात दिवसांच्या आत नोटिसीला उत्तर देण्यास बजावले आहे. राहुल यांना यामुळे शहाणपण येईल असे वाटत नाही. कारण त्यांना एकच माहीत आहे ते म्हणजे ते युवराज आहेत आणि त्यांच्याशिवाय इतर सारे त्यांचे सेवक आहेत. अशा सरंजामी मानसिकतेतून ते आरोप करत आहेत. राहुल यांनी आपल्याकडे जे आरोप आहेत असे ते म्हणतात ते त्यांनी आयोगाकडे सादर करावेत अन्यथा त्यांनी आयोगाला शपथपत्र लिहून द्यावे. असे दोनच पर्याय त्यांच्याकडे आहेत. याशिवाय त्यांच्याकडे तिसरा पर्याय नाही. विशेष सधन पुनर्निरीक्षण सुधारणा सध्या आयोग करत आहे आणि ती प्रक्रिया कायदेशीररीत्या अनिवार्य आहे असे आयोगाने म्हटल्यावर राहुल यांची बोलती बंद झाली. राहुल यांचे आरोप निराधार तर आहेतच पण निवडणूक निकालानंतर ४५ दिवसांच्या आत असे आरोप करणे योग्य आहे पण निवडणूक प्रक्रिया संपल्यावर आयोगावर इतक्या वर्षांनी आरोप करणे म्हणजे याचिकाकर्त्यांचा कुहेतू आहे हे कुमार यांनी म्हटल्यावर सगळेच थंड पडले. पण जनता आता शहाणी झाली आहे आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाल्याने लोकांना दूध का दूध आणि पानी का पानी करायचे कसे ते कळते. त्यामुळे राहुल यांच्या भाकड आरोपावर कुणी विश्वास ठेवणार नाही. राहुल यांचा हेतू शुद्ध नाही केवळ त्यांना आपण सत्तेत येत नाही समजून येऊ लागताच संतापाने त्यांचा कडेलोट झाला आहे.

Comments
Add Comment

अस्थिरतेचे नवे आव्हान

मध्यपूर्वेतील इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे, की हिंसेतून टिकाऊ समाधान मिळत नाही. शस्त्रांपेक्षा संवाद,

सहकार, साखर आणि सत्ता समीकरणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इचलकरंजी दौरा सहकाराच्या चौकटीपलीकडे जात पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या

परीक्षेचा क्षण

यंदाचा मान्सून अद्यापही अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे. कमी पावसामुळे शेती, जलसाठे आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम

BEST Bus Strike : बस थांबल्या, प्रश्न उभे राहिले!

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट सेवेसमोर संपाचे संकट उभे ठाकले आहे. संप किती काळ चालेल हे स्पष्ट नसून, प्रशासन

मृग नक्षत्र लांबले, कोकण कोरडे पडले!

हिरवाई, पाऊस आणि निसर्गाच्या लयीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणावर यंदा बदलत्या हवामानाची छाया गडद झाली. पावसाची

India-US Relations : तणावात मैत्री

भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी-७