पहिली घटना १८ जुलै रोजी घडली, जेव्हा बीडीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ज्योती जांगरा हिने आत्महत्या केली. यानंतर आता १६ ऑगस्ट रोजी, बी.टेकचा विद्यार्थी शिवम कुमारने त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतला. अवघ्या २९ दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्योती आणि शिवम दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्योतीने विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांवर मानसिक छळ आणि अपमानाचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांची नावे नोंदवली होती. यासोबतच, दोन प्राध्यापकांनाही अटक केली.
शुक्रवारी रात्री १८ जुलै रोजी ज्योतीचा मृतदेह तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि दोन डायरी तसेच आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी हे सर्व जप्त केले. ज्योतीचे कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडियावरील संभाषण देखील तपासण्यात आली.
महिंदर सर आणि शेरी मॅमच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे ज्योतीने चिठ्ठीत लिहिले होते. ज्योतीच्या जप्त केलेल्या डायरीतही तिने महिंदर सर आणि शेरी मॅमने केलेल्या छळाविषयी नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्योती जांगरा प्रकरणाच्या २९ दिवसांनंतर, १६ ऑगस्ट रोजी शिवम कुमार डे याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवमने आत्महत्येसाठी स्वतःला जबाबदार धरले आहे. त्याने चिठ्ठीत देश महान बनायचा असेल तर योग्य शिक्षण व्यवस्था सुरू करावी लागेल, असे लिहिले आहे. मागील अनेक दिवस तो कोणत्याही लेक्चरला उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे शिवमचे वडील फी भरत होते. पण मुलगा हॉस्टेवर राहतो आणि लेक्चरला गैरहजर असतो, हे विद्यापीठ प्रशासनाकडून घरच्यांना सांगितले गेले नाही. आता शिवमने आत्महत्या केल्यानंतर ही माहिती त्याच्या घरच्यांना कळली आहे.
ज्योतीने प्राध्यापकांवर छळाचा आरोप केला, तर शिवमच्या कुटुंबातील सदस्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. शिवम सुमारे दीड वर्ष लेक्चरला जात नसताना त्याच्या कुटुंबाला याची माहिती का देण्यात आली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कॅम्पस हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि देखरेखीच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिन्याभरापूर्वीच ज्योतीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर विद्यापीठ व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई का केली नाही ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.