मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मी सर्व १२ राजकीय पक्षांना, मग ते राष्ट्रीय पक्ष असोत किंवा राज्यस्तरीय पक्ष असोत, १ सप्टेंबरपूर्वी बिहारच्या SIR करुन अद्ययावत केलेल्या मतपत्रिकेत चुका दाखवून देण्याचे आवाहन करू इच्छितो. निवडणूक आयोग ते दुरुस्त करण्यास तयार आहे, परंतु १ सप्टेंबरनंतर यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही. कारण त्यानंतर आपण मतदानाच्या इतर प्रक्रियेत सहभागी होऊ. जेव्हा एखादा मतदार मतदान करण्यासाठी जातो आणि बटण दाबतो तेव्हा तो ते फक्त एकदाच दाबू शकतो. मतदान चोरी होऊ शकत नाही. मतदार फक्त एकदाच मतदान करू शकतो; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
महाराष्ट्रात मतदार यादीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा प्रारूप यादी होती तेव्हा दावे आणि हरकती वेळेवर का सादर केल्या गेल्या नाहीत? निकाल आले तेव्हा ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह एकाही मतदाराचे नाव मिळालेले नाही. निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. शेवटच्या एका तासात इतके मतदान कसे झाले असा प्रश्नही विचारण्यात आला होता ? निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते की जर मतदान १० तासांसाठी झाले तर सरासरी दर तासाला १० टक्के होते. १० वेळा किंवा २० वेळा काही तरी बोलल्याने ते खरे ठरत नाही. सूर्य फक्त पूर्वेला उगवतो. फक्त कोणीतरी तसे म्हटले म्हणून तो पश्चिमेला उगवत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
संविधानानुसार, खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीत फक्त भारतीय नागरिकच मतदान करू शकतात. इतर देशातील लोकांना हा अधिकार अजिबात नाही. जर अशा लोकांनी मतमोजणी फॉर्म भरला असेल, तर एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांना काही कागदपत्रे सादर करून त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करावे लागेल. अन्यथा चौकशीनंतर त्यांची नावे वगळण्यात येतील; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.