Sunday, August 10, 2025

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

पालघर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून यात आहे. मात्र यावर अद्याप काही तोडगा निघालेला नाही. आता तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे कि, याच वाहतूक कोंडीमुळे पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेचा रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छाया पूरव असे या मृत महिलेचे नाव आहे.


छाया पुरव आपल्या घराजवळ असताना त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. ३१ जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत छाया यांच्या डोक्याला, खांद्याला आणि मणक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारांची गरज होती. मात्र पालघर जिल्ह्यात ट्रॉमा सेंटर नसल्यामुळे स्थानिक रुग्णालयाने त्यांना हिंदुजा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यादरम्यान स्थानिक रुग्णालय ते मुंबईतील हिंदुजा रुग्णालय असा १०० किमीचा प्रवास अडीच तासात होणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.


२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छाया पुरव यांना भूल देण्यात आली आणि त्यांचा रुग्णवाहिकेतून प्रवास सुरू झाला. त्यांच्याबरोबर त्यांचे पतीही रुग्णवाहिकेत होते. त्यानंतर रुग्णवाहिका एनच-४८ वरील महामार्गावर आली. मात्र सायंकाळी ६ वाजता रुग्णवाहिकेने अर्धेच अंतर पार केले होते. भूलेचा परिणामही हळूहळू ओसरू लागला होता. त्यामुळे छाया पुरव यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे वाटेतच मीरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात सायंकाळी ७ वाजता त्यांना दाखल करण्यात आले. इथून हिंदुजा रुग्णालय केवळ ३० किमीच्या अंतरावर होते.मात्र ऑर्बिट रुग्णालयात दाखल करूनही फारसा उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी छाया पुरव यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


Comments
Add Comment