जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवकाळात रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात. गणेशभक्तांची गैरसोय होउ नये यासाठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवावी, यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुराव करणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
गणेशोत्सवा दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. या स्थितीत भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरू असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.
गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी म्हाडा, एस. आर. ए. महापालिका आणि रेल्वे सह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता जागच्या जागी त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले असल्याचेही लोढा यांनी सांगितले.