खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार
श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ ) रविवारपासून थांबवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. मुळात ही यात्रा रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ९ ऑगस्ट रोजी संपणार होती, मात्र अमरनाथ यात्रा नियोजित वेळेपूर्वीच जवळपास एक आठवडा आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सततचे खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली स्थितीचा या यात्रेवर फटका बसला आहे.
या प्रदेशात मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी ही यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती. शनिवारी अधिकाऱ्यांनी घोषणा केली की बालटाल किंवा पहलगाम या दोन्ही पारंपारिक मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नाही, कारण ट्रॅकची असुरक्षित स्थिती पाहता त्याची तात्काळ डागडुजी करणे आवश्यक आहे.
काश्मीर विभागीय आयुक्तांची प्रतिक्रिया
काश्मीर विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते, अलिकडच्या मुसळधार पावसामुळे सदर भूभागावर वाईट परिणाम झाला आहे, त्यामुळे हा मार्ग यात्रेकरूंसाठी असुरक्षित झाला आहे. दोन्ही मार्गांवर त्वरित दुरुस्ती आणि देखभालीची आवश्यकता आहे आणि दुरुस्तीसाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करून यात्रा सुरू ठेवणे शक्य नाही.
श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या आकडेवारीनुसार, यात्रा मुदतीपूर्वीच संपवली असली तरी, यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी पवित्र गुहेला भेट दिली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून खराब हवामान स्थितीमुळे यात्रेकरूंच्या संख्येतही झपाट्याने घट झाल्याचे सांगण्यात येते.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. सरकारने विद्यमान दलांव्यतिरिक्त ६०० हून अधिक अतिरिक्त निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात केल्या होत्या. त्यामुळे अमरनाथ हे देशातील सर्वात कडक सुरक्षा असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक बनले.
यात्रेकरूंना जम्मूहून दोन्ही बेस कॅम्पमध्ये कडक देखरेखीखाली असलेल्या समुहामध्ये नेण्यात आले आणि श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची हालचाल थांबवण्यात आली. १८५० च्या दशकात बोटा मलिक नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने गुहेचा शोध लावल्यामुळे सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेला ऐतिहासिकदृष्ट्या काश्मीरच्या समन्वित संस्कृतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.