मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद
डोंबिवली : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून मंगळवारी ५ ऑगस्टला ८ तासासाठी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.
ऐन पावसाळ्यात पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितल्यानुसार, पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेचे देखभाल दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील काही गावे, याशिवाय कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा कॉलनी परिसर, मुरबाड रस्ता, सिंडिकेट परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.
तर कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मंगळवारी दुरुस्तीच्या कामाच्यावेळी महावितरणकडून मोहिली जलशुध्दीकरण मीटर युनिट बसवण्यात येणार आहेत. तसेच दिवसभरात किती पाणी उचलले, शुध्द केले याची मोजणी या मीटरच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही अत्यावश्यक कामे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात करावयाची असल्याने मंगळवारी कल्याण शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.