मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला 'ठरलं तर मग' मालिकेतील विलास मर्डर केसचा गुंता अखेर सुटला आहे. अर्जुनने आपल्या बुद्धीमत्तेने साक्षी आणि प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर आणत या प्रकरणाचा निकाल लावला आहे. कोर्टातील सुनावणीच्या शेवटी, अर्जुनने अत्यंत चातुर्याने प्रियाला जाळ्यात ओढले आणि तिच्याकडून सत्य वदवून घेतले. साक्षीच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल या भीतीने प्रियाने साक्षीविरुद्ध खरी साक्ष दिली आणि गेल्या दोन वर्षांपासून ती कोर्टात जे काही सांगत होती, ते सर्व खोटे असल्याची कबुली दिली. प्रियाच्या या कबुलीमुळे रविराज आणि सुभेदारांना मोठा धक्का बसला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केल्याने सुभेदार कुटुंबीय हादरले आहेत.
सुभेदारांच्या मोठ्या सूनेनं दाखवला इंगा
प्रियाच्या कबुलीनंतर 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलीस प्रिया आणि साक्षीला अटक करून नेत असताना कोर्टाबाहेर पूर्णा आजी, कल्पना, सायली आणि अस्मिता उपस्थित असतात. प्रिया पूर्णा आजीची माफी मागण्यासाठी पुढे येते, तेवढ्यात पूर्णा आजी तिच्या कानशिलात जोरात मारते आणि संतापाने म्हणते, "इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही, घेऊन जा हिला." त्यानंतर कल्पनाही प्रियाच्या कानशिलात लगावते आणि तिला म्हणते, "आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे तू हे फळ दिलंस." हे सर्व सुरू असतानाच सायली तिथे येते. प्रिया सायलीला विनवणी करत म्हणते, "मला जेलमध्ये नाही जायचं." त्यावर सायली प्रियाच्या कानशिलात मारते आणि तिला बजावते, "आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया, ही तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे." सायलीने दाखवलेला हा 'इंगा' पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत.
पुढील भागात काय होणार?
कोर्टात शेवटच्या सुनावणीच्या दिवशी अश्विन तिथे नसतो. त्यामुळे आपल्या लाडक्या बायकोला शिक्षा झाली हे कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर, या प्रकरणानंतर कल्पना आणि पूर्णा आजी सायलीचा पुन्हा स्वीकार करतील का, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना पुढील भागाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे ठरले आहे.