शहरी जीवन आणि ग्रामीण जगरहाटी यांचा मिलाफ असलेले काही चित्रपट आतापर्यंत पडद्यावर येऊन गेले आहेत. दोन्ही प्रकारच्या जगण्याचा आलेख अशा पद्धतीच्या गोष्टींतून मांडण्यात येतो आणि त्याद्वारे दोन भिन्न संस्कृतीची प्रतिबिंब रसिकांना अनुभवण्यास मिळतात. अनेक चित्रपटांच्या बाबतीत, त्यांच्या शीर्षकातूनच तो चित्रपट संवाद साधतो; त्यामुळे त्या चित्रपटाविषयीची उत्सुकताही ताणली जाते. आता ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हेच शीर्षक पाहा. या शीर्षकाच्या माध्यमातूनच चित्रपटाबद्दल कुतूहल वाटू लागते. हाच ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट आता पडद्यावर येण्यास सज्ज झाला असून, त्यातून एका लग्नाची गोष्ट उलगडणार असल्याची चर्चा आहे.
आता यात आकर्षणाचा भाग म्हणजे प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले आदी कलाकारांच्या असलेल्या प्रमुख भूमिका! त्यांच्यासह सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत आदी कलावंतही या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे शीर्षक बोलके असल्याचे स्पष्ट होत असतानाच, यातून ग्रामीण भागातल्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेण्यात आला असल्याचे समजते. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन अमरजीत आमले यांचे आहे; तर विजय कलमकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आजकाल ग्रामीण भागात एक वेगळाच प्रश्न उभा ठाकला आहे आणि तो म्हणजे गावातल्या मुलांची लग्ने जमवताना होणारी दमछाक! या विषयाला हाती धरत त्यावर हा चित्रपट भाष्य करणार असून, शहर आणि ग्रामीण भागातल्या एकंदर पार्श्वभूमीवर हे कथानक सादर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.