मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवस संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात २ बाद २२५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप १३३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात केली. त्यांच्या डावाची सुरूवात धमाकेदार राहिली.
बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने जबरदस्त बॅटिंग करताना पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. डकेटने या दरम्यान ७ चौकारांच्या मदतीने ४६ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर क्राऊलीने ७३ बॉलवर आपले अर्धशतक पूर्ण केले. यात ९ चौकारांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला. भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंत अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पाच विकेट मिळवल्या. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ अशा आघाडीवर आहेत. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी हा सामना करो वा मरोचा आहे.
असा होता भारताचा पहिला डाव
टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला यशस्वी जायसवाल आणि केएल राहुलने शानदार सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यशस्वी ५८ आणि केएल राहुल ४६ धावा करून बाद झाले. त्यानंतर साई सुदर्शन आणि ऋषभ पंतनेही चांगली खेळी केली. सुदर्शनने या कसोटीत आपल्या करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकत ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पंत आता साधारण दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.